science exhibition : राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ
मुंबई :
राज्यातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक कल्पकता, सर्जनशीलता आणि नवनिर्मितीच्या वृत्तीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ही सुधारित रक्कम विजेत्यांना दिली जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता मिळविण्यात आली होती.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या ध्येयधोरणांना अनुसरून राज्यातील संशोधनाचा दर्जा उंचावणे आणि केंद्र सरकारच्या इन्स्पायर, हॅकेथॉन यांसारख्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे, हा या निर्णयामागचा मुख्य हेतू आहे. राज्यस्तरीय प्रदर्शनाची प्रक्रिया ही तालुका आणि जिल्हा स्तरावरून सुरू होते, जिथून गुणवंत विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरासाठी केली जाते. या प्रवासात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून बक्षिसांच्या रकमेत सुधारणा करण्यात आली आहे.
नवीन निर्णयानुसार, प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी गट, शिक्षक गट आणि प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर अशा सर्वच श्रेणींमधील विजेत्यांना आता वाढीव रोख रक्कम मिळणार आहे. प्रदर्शनातील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३१ हजार रुपये, तृतीय क्रमांकास २१ हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकास ११ हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात येईल. तसेच, पहिल्या तीन क्रमांकांशिवाय उत्तेजनार्थ तीन क्रमांकांसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक निश्चित करण्यात आले आहे.
दुर्लक्षित आदिवासी, दिव्यांगांसाठीही science exhibition बक्षिसे लागू
या निर्णयामध्ये सर्वसमावेशकतेवर भर देण्यात आला आहे. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी आणि दिव्यांग प्रवर्गातील द्वितीय, तृतीय, चतुर्थ व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही रोख बक्षिसे लागू करण्यात आली आहेत. या संपूर्ण बक्षीस वितरणासाठी शासनाने एकूण १२ लाख ९६ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्य विज्ञान शिक्षण संस्था (नागपूर) या उपक्रमाची समन्वयक म्हणून काम पाहत असून, या निर्णयामुळे राज्यातील बालवैज्ञानिकांना आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी मोठे पाठबळ मिळणार आहे.
बालवैज्ञानिकाच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा केलेला सन्मान
बदलता महाराष्ट्र आणि आधुनिक भारताच्या उभारणीत आपल्या शालेय विद्यार्थ्यांचा वाटा मोठा असावा, असे आमचे ध्येय आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची वृत्ती जोपासणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीमध्ये संशोधन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना आम्ही प्राधान्य देत आहोत. बक्षिसांच्या रकमेत केलेली ही वाढ केवळ आर्थिक मदत नसून, ती राज्यातील प्रत्येक बालवैज्ञानिकाच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा केलेला सन्मान आहे. यातूनच भविष्यातील महान शास्त्रज्ञ घडतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.


