Mumbai Uiversity : प्राचीन भारतीय विचारसरणीचा करणार अभ्यास
मुंबई विद्यापीठ, गितार्थ गंगा व ज्योत संस्थेमध्ये सामंजस्य करार
मुंबई :
अर्थनीती, राजकारण, समाजरचना, न्यायव्यवस्था यांसारख्या क्षेत्रांतील प्राचीन भारतीय विचारसरणीचा अभ्यास करून ती आजच्या शासनव्यवस्था व धोरणनिर्मितीसाठी उपयुक्त ठरावी, यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाने नुकताच गुजरातमधील गितार्थ गंगा संस्था आणि ज्योत या स्वयंसेवी संस्थेमध्ये नुकताच सामंजस्य करार केला. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेच्या आधारे जागतिक कल्याणाचा विचार या उपक्रमातून पुढे नेण्यात येणार आहे.
प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा, न्यायव्यवस्था आणि सामाजिक-आर्थिक तत्त्वज्ञानाच्या आधुनिक उपयोगासाठी मुंबई विद्यापीठ, गुजरातमधील गितार्थ गंगा संस्था आणि ज्योत या स्वयंसेवी संस्थेमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्राचीन भारतीय शास्त्रांमधील कालातीत तत्त्वज्ञानाचा आधुनिक काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक व न्यायिक व्यवस्थांमध्ये उपयोग करणे हा कराराचा मुख्य उद्देश आहे. या करारानुसार संयुक्त संशोधन प्रकल्प, परिषद, परिसंवाद, शैक्षणिक प्रकाशने, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, शैक्षणिक साहित्याचा परस्पर वापर यासारख्या उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठ हे देशातील एक जुने व प्रतिष्ठित विद्यापीठ असून गितार्थ गंगा आणि ज्योत या दोन्ही संस्था प्राचीन शास्त्र, तत्त्वज्ञान व भारतीय ज्ञानपरंपरेवर संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. या दोन्ही संस्थांचे कार्य जैनाचार्य योगभूषणसूरीजी महाराज, भगवान महावीरांचे ७९ वे उत्तराधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या करारामुळे प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा शास्त्रीय अभ्यास आणि त्याचा आधुनिक समाजासाठी उपयोग अधिक व्यापक पातळीवर होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.


