Addiction-free pledge campaign : व्यसनमुक्ती शपथ अभियानाचा मंत्री लोढा यांच्या हस्ते शुभारंभ
१० कोटी नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्याचा ब्रह्माकुमारीजचा राष्ट्रव्यापी संकल्प
मुंबई :
मुंबई : ब्रह्माकुमारीजच्या वतीने देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा अभियान’ (10 Crore Addiction-Free Pledge Mega Campaign) या राष्ट्रव्यापी उपक्रमाच्या मुंबई अभियानाचा शुभारंभ आज वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (भायखळा प्राणिसंग्रहालय) येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाला. राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते.
अभियानाचा शुभारंभ करताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी दिलेल्या ‘नशामुक्त भारत’च्या आवाहनाला जनआंदोलनाचे स्वरूप देणे ही काळाची गरज आहे. केवळ सरकार, पोलीस किंवा प्रशासन व्यसनमुक्त भारत घडविण्याचे कार्य करू शकत नाही. समाजातील प्रत्येक नागरिक आणि ब्रह्माकुमारीजसारख्या आध्यात्मिक संस्थांच्या सहभागातूनच १० कोटी नागरिकांपर्यंत व्यसनमुक्तीची शपथ पोहोचू शकते.

ते पुढे म्हणाले, आपल्या तरुण पिढीला व्यसनांच्या आहारी लावूनही देश कमकुवत करण्याचा प्रयत्न होतो. बनावट चलन, सामाजिक तेढ आणि अराजकता निर्माण करण्याइतकेच व्यसनही राष्ट्रासाठी धोकादायक आहे. अशा वेळी समाजात संस्कार, आत्मबल आणि सकारात्मक विचार जागविणाऱ्या संस्था राष्ट्रासाठी संरक्षणकवच म्हणून उभ्या राहतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी महाराष्ट्रात व्यसनमुक्तीला जनचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केल्याचा उल्लेख करत लोढा म्हणाले, “प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि परिसरात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचला पाहिजे. शासनाने स्थापन केलेल्या व्यसनमुक्ती समित्यांमध्ये सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनी सहभागी व्हावे. ब्रह्माकुमारीजने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये सातत्याने जनजागृती करावी. शासन या कार्यात पूर्ण सहकार्य करेल.”
Addiction-free : ० कोटी नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात येणार
देशभर ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून १० कोटी नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात येणार असून, राजयोग ध्यान, शाळा-महाविद्यालयांतील जनजागृती, सामाजिक उपक्रम आणि विविध कार्यक्रमांद्वारे व्यसनमुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. लोढा म्हणाले, “व्यसनमुक्त भारत ही केवळ शासनाची योजना नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने स्वतः व्यसनमुक्त राहण्याची शपथ घ्यावी आणि आपल्या कुटुंबात, समाजात व मित्रपरिवारातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा. जनसहभागातूनच निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त भारताची निर्मिती होईल.



