Mumbai University : एलएलएम सीईटी आणि बार कौन्सिलची परीक्षा एकाच दिवशी
Mumbai University, LLM CET, Bar Council exams
मुंबई :
वकीली व्यवसाय करण्यासाठी महत्त्वाची असलेली ‘अखिल भारतीय बार परीक्षा २१’ ही बार काैन्सिल ऑफ इंडियामार्फत ७ जून रोजी घेण्यात येणार आहे. त्याचदिवशी मुंबई विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एलएलएम प्रवेशासाठी सीईटी परीक्षा जाहीर केली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या एलएलएम सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
दोन्ही परीक्षा ७ जून रोजीच
विधिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना वकीली व्यवसाय सुरू करता येतो. बरेच विद्यार्थी हे वकीली व्यवसायाबरोबरच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याला प्राधान्य देतात. जेणेकरून प्रत्यक्ष अनुभवाबरोबरच शैक्षणिक ज्ञान घेता येते. त्यासाठी हे विद्यार्थी एलएलएमला प्रवेश घेत असतात. मात्र मुंबई विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या एलएलएम सीईटीची तारीखेच्याच दिवशी बार काैन्सिल ऑफ इंडियाकडून घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय बार परीक्षा-२१ सुद्धा आहे. बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष वकीलीचा व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळतो. यासाठी बार कौन्सिलने फेब्रुवारीमध्येच ७ जून रोजी परीक्षा घेणार असल्याचे जाहीर करत नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी करत तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा : Rising heat : वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकरांची वाढली पोटदुखी

Mumbai University च्या विद्यार्थ्यांना मुकावे लागणार एलएलएम सीईटीला
मुंबई विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी पदव्युत्तर म्हणजेच एलएलएम अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेली सीईटी ही ७ जून रोजीच घेण्यात येणार आहे. ‘अखिल भारतीय बार परीक्षा’ उत्तीर्ण झाल्याशिवाय प्रत्यक्ष वकीली करता नाही. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील विधिचे पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एलएलएमच्या सीईटीला मुकावे लागणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने एलएलएम सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या बाबतीत वारंवार गोंधळ घालण्यात येतो. ही परंपरा विद्यापीठाने कायम ठेवली आहे. मुंबई विद्यापीठाने एलएलएम सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही परीक्षा पुढे ढकलावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना ‘अखिल भारतीय बार परीक्षा २१’ व एलएलएम सीईटी अशा दोन्ही परीक्षा देणे शक्य होईल.
– सचिन पवार, विद्यार्थी कार्यकर्ता, भाजप


