CET EXAM : दुसऱ्या संधीची पीसीएम समूहाची परीक्षा उद्यापासून
राज्यात दुसऱ्या संधीसाठी ३ लाख २१ हजार ९१७ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार
मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) व कृषी शिक्षण (Agriculture Education) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या संधीची सीईटी प्रवेश परीक्षा आजपासून दिनांक १२ मे ते २० मे २०२६ दरम्यान सहा दिवस (दिनांक १६, १७ व १८ मे २०२६ वगळून) सकाळी व दुपारी अशा दररोज दोन बॅचनुसार घेण्यात येत आहेत. राज्यात दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ३ लाख २१ हजार ९१७ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. हि सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होत आहे. पीसीएम समूहाच्या सीईटीसाठी राज्यात ३६ जिल्ह्यातील १९४ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होत आहे.
यावर्षी पीसीएम समूहाच्या या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ३ लाख २१ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये १ लाख ९७ हजार ८८३ विद्यार्थी (Male), १ लाख २४ हजार ०७१ विद्यार्थिनी (Female), १३ तृतीयपंथी (Transgender) व ९६८ दिव्यांग (PWD) पीसीएम समूहाची सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. ही सीईटी ऑनलाईन पद्धतीने होणार असून. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील १९४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.
पहिल्या संधीच्या CET साठी ९४.७३ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
यावर्षी प्रथमच राज्यातील विद्यार्थ्यांना पीसीएम समूहासाठी सीईटीच्या दोन संधी मिळत आहेत. यातील पहिल्या संधीची सीईटी दिनांक ११ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाली आहे. राज्यात पहिल्या संधीच्या सीईटीसाठी ४ लाख ७९ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ५४ हजार ०७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेला ९४.७३ % विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
प्रथमच प्रवेश परीक्षेच्या दोन CET च्या संधी
राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या (मुख्य ) दोन प्रवेश परीक्षा होतात, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील मुलांनाही दोन संधी मिळाव्यात यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर्षापासून एमएचटी सीईटी (पीसीएम समूह), एमएचटी सीईटी (पीसीबी समूह ) व एमबीए-एमएमएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोन वेळेस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा बंधनकारक तर दुसरी ऐच्छिक ठेवण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करतानाच दोन प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत की एक प्रवेश परीक्षा द्यायची हे विचारण्यात येत होते.



