Newborns die : राजावाडी रुग्णालयामध्ये तीन नवजात शिशूंचा मृत्यू
मुंबई :
राजावाडी रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या तीन महिलांच्या नवजात अर्भकांचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करत राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांना घेराव घालून कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी चौकशी करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.

राजावाडी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या तीन महिलांपैकी दोन महिलांच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला तर एका बाळाचा जन्मानंतर दोन तासांनंतर मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या बाळाच्या मृत्यू झालाचा आरोप करत मनसेने सुमारे दीड तास राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना घेराव घातला. मृत्यूंची चौकशी व्हावी, दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. तसेच कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता. संबंधित महिला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने त्रस्त होती. अन्य एका प्रकरणात उपचारादरम्यान काही अडचणी आल्या. तिन्ही प्रकरणांमध्ये वैद्यकीय कारणे असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. रुग्णालयातील आवश्यक सुविधा सुरू होत्या. मात्र, एकाच दिवशी तीन अर्भकांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणांची चौकशी केली जाईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Newborns die : प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश – हरिष भांदिर्गे
उपनगरीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार आणि राजावाडी रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती राजुलवाला यांच्याकडून सर्व माहिती घेतली आहे. त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नेमके या नवजात शिशुच्या मृत्यूचे कारण काय? हे चौकशीतून समोर येणार असल्याचे आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सांगितले.



